*लातूर शहरात गणेशोत्सव काळात डीजे / डॉल्बी वापरून ध्वनी प्रदूषण करणाऱ्या १० गणेश मंडळांवर व १० डीजे/डॉल्बी मालकांवर न्यायालयात खटले दाखल.*

       लातूर (पोअका)  : लातूर शहरामध्ये सन २०२५ मधील गणेशोत्सव हा दिनांक २७/०८/२०२५ ते ०६/०९/२०२५ या कालावधीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तथापि, या कालावधीत काही गणेश मंडळांकडून डीजे/डॉल्बीचा वापर करून ध्वनी प्रदूषण केल्याचे पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास आले होते.
        ध्वनी प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेता, गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वीच गणेश मंडळांना परवानगी देताना स्पष्ट अटी व बंधने घालण्यात आली होती. यामध्ये प्रामुख्याने ध्वनी प्रदूषण (विनियमन व नियंत्रण) नियम २००० चा भंग होणार नाही, तसेच मोठ्या क्षमतेच्या ध्वनी प्रक्षेपण यंत्रणा (डीजे/डॉल्बी) वापरण्यास सक्त मनाई करण्यात आली होती. या अटींची लेखी नोटीस देवून मंडळांना परवानगी देण्यात आली होती.
यासोबतच गणेशोत्सव काळात ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी वर्तमानपत्रांद्वारे, तसेच वेळोवेळी गणेश मंडळांच्या बैठका घेऊन पोलीस प्रशासनामार्फत आवाहन करण्यात आले होते. या आवाहनास अनेक मंडळांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. मात्र, असे असतानाही दिनांक २७/०८/२०२५ रोजी गणेशस्थापना मिरवणुकांदरम्यान लातूर शहरातील १० गणेश मंडळांनी डीजे/डॉल्बी लावून ध्वनी प्रदूषण केल्याचे आढळून आले.
          या प्रकरणी संबंधित १० गणेश मंडळांचे अध्यक्ष तसेच त्या मंडळांकडून वापरण्यात आलेल्या १० डीजे/डॉल्बी मालकांविरुद्ध दिनांक २७/०१/२०२६ रोजी मा. न्यायालय, लातूर येथे पर्यावरण (संरक्षण) कायदा, १९८६ चे कलम १५ व १९ तसेच ध्वनी प्रदूषण (विनियमन व नियंत्रण) नियम, २००० अन्वये खटले दाखल करण्यात आले आहेत.
सदर अपराधासाठी ०५ वर्षांपर्यंत कारावास अथवा एक लाख रुपये दंड अथवा दोन्ही शिक्षा होण्याची तरतूद आहे.
        ही संपूर्ण कारवाई श्री. अमोल तांबे, पोलीस अधीक्षक, लातूर व श्री. मंगेश चव्हाण, अपर पोलीस अधीक्षक, लातूर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. समीरसिंह साळवे, उपविभागीय पोलीस अधिकारी, लातूर शहर यांच्या नेतृत्वाखाली पोनि. सुनिल रेजीतवाड (पो.स्टे. गांधी चौक), पोनि. अभिषेक शिंदे (पो.स्टे. शिवाजीनगर), पोनि. समाधान चवरे (पो.स्टे. एमआयडीसी), तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील पोउपनि. राजाभाऊ सूर्यवंशी, पोलीस अंमलदार पांडुरंग सगरे व अरविंद वाघमोडे यांनी सक्रिय सहभाग घेतला.
                *लातूर जिल्हा पोलीस दलाचे आवाहन.*
       आगामी काळातील सर्व सण-उत्सव शांततेत, नियमांचे पालन करून साजरे करण्यात यावेत. आगामी येणाऱ्या सर्व सण उत्सवा दरम्यान डीजे/डॉल्बी लावून ध्वनी प्रदूषण केल्यास संबंधित सण उत्सव मंडळांचे अध्यक्ष तसेच डीजे/डॉल्बी मालकांविरुद्ध पर्यावरण (संरक्षण) कायदा, १९८६ व ध्वनी प्रदूषण (विनियमन व नियंत्रण) नियम, २००० अंतर्गत कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, याची सर्वांनी नोंद घ्यावी.

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी ५ ऐवजी ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी

     मुंबई, दि. २९ः उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला असल्यामुळे १२ जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या उर्वरित टप्प्यांमध्ये बदल करण्यात आला असून ५ फेब्रुवारी २०२६ ऐवजी आता ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान; तर ७ फेब्रुवारी २०२६ ऐवजी ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी होईल.
      राज्य निवडणूक आयोगाने या जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी १३ जानेवारी २०२६ रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार नामनिर्देशनपत्र दाखल करणे, नामनिर्देशनपत्र मागे घेणे, चिन्ह वाटप आणि निवडणूक लढविणाऱ्या अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे इत्यादी टप्यांच्यी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यापुढील मतदान, मतमोजणी आणि निवडून आलेल्या सदस्यांची नावे राजपत्रात प्रसिद्ध करणे हे टप्पे शिल्लक आहेत.
      मा. सर्वोच्च न्यायालयाने या निवडणुकांसाठी ३१ जानेवारी २०२६ च्या पुढे फक्त दोन आठवड्यांची मुदत वाढ दिली आहे; परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी २०२६ रोजी अपघाती निधन झाल्यामुळे राज्य शासनाने राज्यात २८ जानेवारी २०२६ ते ३० जानेवारी २०२६ पर्यंत दुखवटा जाहीर केला आहे. या कालावधीचा विचार करून जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या कार्यक्रमातील उर्वरित टप्प्यांमध्ये बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार संबंधित जिल्हाधिकारी सुधारित निवडणूक कार्यक्रमाची सूचना ३१ जानेवारी २०२६ रोजी प्रसिद्ध करतील. आता ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल. त्यामुळे जाहीर प्रचाराची समाप्ती ५ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री १० वाजता होईल. संबंधित ठिकाणी ९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता मतमोजणी सुरु होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर संबंधित ठिकाणची आचारसंहिता संपुष्टात येईल. निवडून आलेल्या सदस्यांची नावे शासन राजपत्रात ११ फेब्रुवारी २०२६ पर्यंत प्रसिद्ध केली जातील.

*“कौटुंबिक वादातून घडलेले अमानुष कृत्य : एमआयडीसी पोलिसांची तात्काळ व कठोर कारवाई, निष्पाप बालिकेला न्याय देण्याचा निर्धार”.*

      लातूर (पोअका) : लातूर शहरात घडलेल्या अत्यंत दुर्दैवी व हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण समाजमन सुन्न झाले आहे. कौटुंबिक वादातून एका निष्पाप बालिकेचा बळी जाणे ही अत्यंत गंभीर व वेदनादायक बाब असून अशा अमानुष कृत्याविरोधात लातूर पोलीस प्रशासनाने तात्काळ, प्रभावी व कायदेशीर कारवाई करत आपली जबाबदारी अत्यंत तत्परतेने पार पाडली आहे.
      फिर्यादी विक्रम जगन्नाथ चौगुले, वय ३४ वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. हासेगाव सी, ता. कळंब, जि. धाराशिव, सध्या रा. श्यामनगर, मांजरा गेट समोर, ता. जि. लातूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्यांची पत्नी आश्विणी विक्रम चौगुले, वय ३० वर्षे, रा. हासेगाव सी, ता. कळंब, जि. धाराशिव हिच्या विरोधात एमआयडीसी पोलीस स्टेशन, लातूर येथे गुन्हा रजिस्टर नंबर २४/२०२६, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३ (१) अन्वये दिनांक १९/०१/२०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
      घटनेची पार्श्वभूमी अशी की, आरोपी महिलेने दिनांक १८/०१/२०२६ रोजी आपल्या पतीस फोन करून “कामावरून घरी कधी येणार” अशी विचारणा केली होती. पती घरी न आल्याने रागाच्या व मानसिक अस्थैर्याच्या भरात दिनांक १९/०१/२०२६ रोजी पहाटे सुमारे ०५.०० ते सकाळी १०.०० वाजण्याच्या दरम्यान श्यामनगर, मांजरा गेट समोर, लातूर येथील राहत्या घरी आपल्या अल्पवयीन मुलगी नंदिनी विक्रम चौगुले, वय १.५ वर्षे हिच्यावर घरातील चाकूने अंगावर विविध ठिकाणी वार करून गंभीर जखमी केले. या गंभीर जखमांमुळे उपचारादरम्यान बालिका नंदिनी हिचा दुर्दैवी मृत्यू झाला.
      घटना अत्यंत गंभीर स्वरूपाची असल्याने एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळ पंचनामा केला तसेच मृतदेहावर इनक्वेस्ट पंचनामा करून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. आरोपी नामे आश्विणी विक्रम चौगुले हिला त्वरित ताब्यात घेऊन कायदेशीर अटक करण्यात आली असून गुन्ह्यात वापरलेला चाकू जप्त करण्यात आला आहे. संपूर्ण तपास शास्त्रीय पद्धतीने, पुराव्यांच्या आधारे व कायदेशीर चौकटीत पार पाडला जात आहे.
       ही कारवाई श्री. अमोल तांबे, पोलीस अधीक्षक, लातूर, श्री. मंगेश चव्हाण, अपर पोलीस अधीक्षक, लातूर तसेच श्री. समीरसिंह साळवे, उपविभागीय पोलीस अधिकारी, लातूर शहर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. समाधान चवरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री. श्रीकांत मोरे, पोलीस अमलदार जाधव, तुरे, कलमुकले यांनी अत्यंत तत्परतेने व जबाबदारीने ही संपूर्ण कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.
       गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत मोरे हे करीत असून आरोपीविरुद्ध कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. अशा प्रकारच्या अमानुष व मानवतेला काळीमा फासणाऱ्या घटनांबाबत लातूर पोलीस प्रशासन हे कठोर आणि कायदेशीर धोरण अवलंबित असून समाजातील प्रत्येक घटकाचे संरक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहे.
       नागरिकांनी कोणत्याही कौटुंबिक तणावाच्या प्रसंगी कायदा हातात न घेता समुपदेशन, सामाजिक व कायदेशीर मार्गांचा अवलंब करावा, असे आवाहनही लातूर पोलीस प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.
       लातूर पोलीस प्रशासन समाजातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी, गुन्हेगारी प्रवृत्तीवर कठोर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि प्रत्येक निष्पाप नागरिकाला न्याय मिळवून देण्यासाठी सदैव सज्ज असून अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये तत्काळ व प्रभावी कारवाई करून न्यायप्रक्रियेला गती देण्याचा लातूर पोलिसांचा निर्धार आहे.

*शाई पुसून गैरकृत्य करणाऱ्यास**पुन्हा मतदान करता येणे शक्य नाही*

      मुंबई, दि. 15 : बोटावर लावण्यात आलेली शाई पुसण्याचा प्रयत्न करून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करणे हे गैरकृत्य आहे. त्याचबरोबर बोटावरची शाई पुसून एखादी व्यक्ती पुन्हा मतदान करण्यासाठी आल्याचे आढळल्यास त्यावर योग्य ती कायदेशीर कार्यवाही केली जाईल, असे स्पष्टीकरण राज्य निवडणूक आयोगाने केले आहे.
       बोटावरची शाई पुसून कोणी गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केला तरी संबंधित मतदाराला पुन्हा मतदान करता येत नाही, याबाबतची दक्षता यापूर्वीच घेण्यात आली आहे. मतदाराने मतदान केल्यानंतर त्याबाबत नोंद घेण्यात आलेली असते. त्यामुळे केवळ शाई पुसून गैरकृत्य केलेल्या मतदाराला पुन्हा मतदान करता येत नाही. याबाबत सतर्कता बाळगण्याच्या सूचना पुन्हा एकदा सर्व संबंधिताना देण्यात आल्या आहेत. 
       मतदाराच्या बोटाला शाई लावण्याकरिता मार्कर पेनच्या वापराबाबत राज्य निवडणूक आयोगाने 19 नोव्हेंबर 2011 रोजी आणि 28 नोव्हेंबर 2011 रोजी आदेश निर्गमित केले आहेत. तेव्हापासून स्थानिक स्वराज्‍य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतदाराच्या बोटाला शाई लावण्यासाठी मार्कर पेनचा वापर केला जात आहे. या आदेशानुसार मतदाराच्या बोटावर ठळकपणे उमटेल, अशा पद्धतीने मार्कर पेनने शाई लावण्यात यावी; तसेच नखावर आणि नखाच्या वरच्या बाजुला त्वचेवर तीन- चार वेळा घासून शाई लावावी, अशा सूचना यापूर्वी देखील देण्यात आल्या असून आणि त्या मार्कर पेनवरही नमूद केल्या आहेत. त्यामुळे शाई पुसण्याचा प्रयत्न करण्याचे गैरकृत्य करू नये, असे आवाहन राज्य निवडणूक आयोगाने केले आहे.  
०००

लातूर महानगरपालिका निवडणूक मतदान केंद्रांच्या २०० मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू

     लातूर, दि. १४ : लातूर शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनिमित्त १५ जानेवारी २०२६ शांतता, निर्भयता आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अंतर्गत आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार लातूर शहरातील सर्व मतदान केंद्रांपासून २०० मीटर परिसरात विविध प्रतिबंध लागू करण्यात आले आहेत.
      राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमानुसार महानगरपालिका निवडणुकीसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार मतदान सुरू झाल्यापासून ते मतदान संपेपर्यंत मतदान केंद्र परिसरात प्रतिबंध लागू राहतील. मतदान केंद्रापासून २०० मीटर परिसरात मंडपे, दुकाने किंवा तात्पुरत्या रचनांचे उभारणे पूर्णपणे प्रतिबंधित राहील. मोबाईल फोन, स्मार्ट फोन, कॉर्डलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनीक्षेपक (लाउडस्पीकर) व इतर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक उपकरणे बाळगणे किंवा वापरणे यावर बंदी राहील. निवडणूक कामाशी संबंधित नसलेली खाजगी वाहने आणणे, 
संबंधित पक्षाचे चिन्हे प्रदर्शित करणे, निवडणूक कामाशी संबंधित नसलेल्या व्यक्तींना मतदान केंद्र परिसरात प्रवेश करण्यास मनाई राहील.
      हे आदेश फक्त मतदान दिवशी सकाळी मतदान सुरू होण्यापासून ते संपूर्ण मतदान प्रक्रिया संपेपर्यंत अंमलात राहतील. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
लातूर शहर महानगरपालिका निवडणूक
मतदान केंद्र संख्या - 375
मतदान पथके 375
राखीव मतदान पथके 41
एकूण कर्मचारी संख्या: 1875
पोलीस कर्मचारी संख्या: 375
एकूण: 2250
आदर्श मतदान केंद्र: 6
सखी मतदान केंद्र: 3
पर्यावरण पूरक मतदान केंद्र: 2

निवडणुकीच्या प्रशिक्षणास गैरहजर अधिकारी व कर्मचारी यांना नोटीस, शिस्तभंगाची कार्यवाही प्रस्तावित !

      लातूर/प्रतिनिधी : दिनांक २८ डिसेंबर २०२५ रोजी लातूर शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान प्रक्रियेतील जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या बूथवरील केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांचे अनिवार्य प्रशिक्षण सिद्धेश्वर व रत्नेश्वर सभागृह येथे आयोजित करण्यात आले होते.

      मात्र सदर प्रशिक्षणास दांडी मारणाऱ्या एकूण २६५ अधिकारी व कर्मचारी यांच्यावर निवडणूक नियमांनुसार नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे. नोटीस प्राप्तीनंतर संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून समाधानकारक खुलासा प्राप्त न झाल्यासशिस्तभंगाची व फौजदारी स्वरूपाची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.ही माहिती उपायुक्त (निवडणूक) श्री. पंजाबराव खानसोळे यांनी दिली असूननिवडणूक प्रक्रिया पारदर्शकशिस्तबद्ध व कायदेशीर पद्धतीने पार पडावी यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

............


*शासकीय कार्यालये, विश्रामगृहे परिसरात मिरवणुका, घोषणा, उपोषण, सभा घेण्यावर निर्बंध*

     लातूर, दि. २३ : राज्य निवडणूक आयोगाने १५ डिसेंबर २०२५ रोजी लातूर शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार या क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांनी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये आदेश निर्गमित केले आहेत.
       त्यानुसार स्थानिक स्वराज्य मतदारसंघ कार्यक्षेत्रात निवडणूक कालावधीत शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था कार्यालये, विश्रामगृहे इत्यादी परिसरात मिरवणुका, घोषणा देणे, सभा घेणे इत्यादीवर निर्बंध घातले आहेत.

वैशिष्ट्यीकृत बातम्या

*लातूर शहरात गणेशोत्सव काळात डीजे / डॉल्बी वापरून ध्वनी प्रदूषण करणाऱ्या १० गणेश मंडळांवर व १० डीजे/डॉल्बी मालकांवर न्यायालयात खटले दाखल.*

       लातूर (पोअका)  : लातूर शहरामध्ये सन २०२५ मधील गणेशोत्सव हा दिनांक २७/०८/२०२५ ते ०६/०९/२०२५ या कालावधीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात ...

लोकप्रिय बातम्या