पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या बसलातूर मध्यवर्ती बसस्थानकातून सुटणार

      
      लातूर, दि. 23 (जिमाका): राज्य परिव मध्यवर्ती बसस्थानक क्र. 1 लातूर येथील काँक्रीटीकरणाचे काम 27 जानेवारी, 2025 पासून सुरु करण्यात आले होते. त्यामुळे काँक्रीटीकरणाच्या कामकाजादरम्यान मध्यवर्ती बसस्थानक क्र. 1 लातूर येथून सुटणाऱ्या पुणे व मुंबई मार्गावरील सर्व फेऱ्या बसस्थानक क्र. 2 येथून सुरु होत्या, या सर्व फेऱ्या 26 सप्टेंबर, 2025 पासून पूर्वेवत मध्यवर्ती बसस्थानक क्र. 1 येथून सुरु करण्यात येत आहेत, असे लातूर राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक यांनी कळविले आहे.

गणेश विसर्जन मिरवणुकी डॉल्बीमुक्त मिरवणुकीसाठी नवीन ट्रेड स्थापित केला ! पोलीस अधीक्षक यांच्याकडून आभार व्यक्त !

माझ्या प्रिय मित्रांनो,
काल लातूर आणि संपूर्ण जिल्ह्यात झालेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांनी डॉल्बीमुक्त मिरवणुकांसाठी एक नवीन ट्रेंड स्थापित केला.
तसेच मिरवणुकींदरम्यान विविध संस्कृती, परंपरा आणि कलांचे प्रदर्शन करण्याची ही एक संधी ठरली.
या मिरवणुकींमधील सर्वात चांगले लक्षण म्हणजे मोठ्या संख्येने महिला, मुली, वृद्ध आणि अगदी लहान मुलांनी शेवटपर्यंत याचा आनंद घेतला.
यामुळे तरुण मुला-मुलींना जवळजवळ दोन महिने ढोल-ताशा गटासाठी सराव करण्याची चांगली संधी मिळाली आणि त्यामुळे त्यांच्या शारीरिक तंदुरुस्तीचीही चाचणी झाली.
डॉल्बी टाळण्याची समाजातील सर्व वर्गांची मागणी होती,
लातूर पोलिस विभागाकडून डॉल्बीमुक्त होण्याचे आवाहन करण्यात आले होते,
माध्यम मित्रांच्या सकारात्मक आणि सक्रिय सहभागाशिवाय हे शक्य नव्हते.
तुम्ही या मोहिमेला पाठिंबा दिला आणि हे निकाल साध्य करण्यात मोठी भूमिका बजावली.
तुम्ही सर्वांच्या सक्रिय आणि सकारात्मक पाठिंब्याबद्दल मी मनापासून आभार मानतो आणि भविष्यातही असेच सहकार्य करण्याची विनंती करतो.
🙏🏻
जय हिंद.
 सादर,
 अमोल तांबे,
 एसपी- लातूर.

*'महसूल लोक अदालत'चे १३ सप्टेंबर रोजी आयोजन*

     
      लातूर, (जिमाका) : महसूल विभाग हा महाराष्ट्र शासनाच्या प्रशासनाचा कणा मानला जातो. ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांना विविध शासकीय सेवा पुरविणे, जमिनीचे अभिलेख अद्ययावत ठेवणे, सातबारा उतारा सुलभपणे उपलब्ध करून देणे आणि नागरिकांचे प्रलंबित प्रश्न जलदगतीने निकाली काढणे, ही महसूल विभागाची प्राथमिक जबाबदारी आहे. नागरिकांना त्वरित न्याय मिळावा आणि प्रलंबित प्रकरणांचा कमीत कमी वेळेत निपटारा व्हावा, यासाठी महसूल विभाग सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित आहे. याच अनुषंगाने शनिवार, १३ सप्टेंबर २०२५ रोजी जिल्हा, उपविभाग, तालुका आणि मंडळ स्तरावर महसूल लोक अदालत आयोजित करण्यात येणार आहे.
      महसूल न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेली आणि ज्यामध्ये दोन्ही पक्षकार तडजोडीने वाद मिटविण्यास तयार असतील, अशी प्रकरणे या लोक अदालतीत निकाली काढली जातील. पक्षकार स्वतः किंवा त्यांच्या वकिलांमार्फत उपस्थित राहून तडजोड दाखल करू शकतील. तडजोडीवर आधारित प्रकरणाचा निपटारा झाल्यास त्याविरुद्ध कोणतेही अपील दाखल करता येणार नाही. ही लोक अदालत दिवाणी न्यायालयाच्या धर्तीवर कार्यान्वित केली जाईल.
      सर्व तडजोडी कायदेशीर चौकटीत असाव्यात. कायदेशीर तरतुदींना विरोधी तडजोड स्वीकारली जाणार नाही. लोक अदालतीत दाखल झालेली प्रकरणे संबंधित प्राधिकरणामार्फत पुढील सात दिवसांत निकाली काढली जातील.
      *लोक अदालतीची वेळ आणि ठिकाण*
मंडळ स्तरावर संबंधित मंडळ अधिकारी कार्यालय, तालुका स्तरावर संबंधित तहसील कार्यालय, उपविभाग स्तरावर संबंधित उपविभागीय अधिकारी कार्यालय आणि 
जिल्हा स्तरावर अपर जिल्हाधिकारी कार्यालय येथे १३ सप्टेंबर रोजी सकाळी ११:०० ते सायंकाळी ४:०० या वेळेत महसूल लोक अदालत आयोजित केली जाईल. संपर्कासाठी संबंधित कार्यालयाचे प्रमुख उपलब्ध असतील.
       महसूल लोक अदालतीचा लाभ घेऊन नागरिकांनी आपली प्रलंबित प्रकरणे तडजोडीद्वारे निकाली काढावीत, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी शिल्पा न. करमरकर यांनी केले आहे.

MH24-CC मालिकेअंतर्गत. आकर्षक वाहन क्रमांक राखीव करण्यासाठी अर्ज. करण्याचे आवाहन

       लातूर,(जिमाका) : दि. ३१ ऑगस्ट २०२५: परिवहनेत्तर (मोटरसायकल) संवर्गातील वाहनांसाठी MH24-CC ही नवीन मालिका सुरू करण्यात येत आहे. या मालिकेअंतर्गत आकर्षक आणि पसंतीचे वाहन क्रमांक राखीव करण्यासाठी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात राबविली जाणार आहे.
     दिनांक ०२ सप्टेंबर २०२५ रोजी मोटार कार आणि मालवाहू वाहनांसाठी (दुचाकी वगळून), तर दिनांक ०३ सप्टेंबर २०२५ रोजी दुचाकी वाहनांसाठी सकाळी १०:३० ते दुपारी २:३० या वेळेत अर्ज आणि विहित शुल्कासह राष्ट्रीयकृत बँकेचा धनादेश (डीडी) स्वीकारला जाईल.एखाद्या विशिष्ट क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास, त्या क्रमांकाचा लिलाव दिनांक ०३ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ४:०० वाजता उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या कक्षात आयोजित केला जाईल. 
      लिलावात सहभागी अर्जदाराने वाढीव रक्कमेचा धनादेश (डीडी) सादर करणे बंधनकारक असेल. ज्या अर्जदाराने सर्वाधिक वाढीव रक्कमेचा धनादेश सादर केला, त्याला संबंधित आकर्षक पसंतीचा क्रमांक राखीव ठेवला जाईल. सर्व इच्छुकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.

*लातूर जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाच्या पाण्यामुळे प्रभावित झालेल्या रस्त्याची/पुलांची अद्ययावत माहिती-*

      लातूर (जिमाका) : लातूर जिल्ह्यातील पूर परिस्थितीच्या संदर्भात जिल्हा प्रशासनाकडून दिलेल्या माहितीप्रमाणे, खालील मार्गावर पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे वाहनांची वाहतूक तात्पूरती बंद करण्यात आली आहे. 1. माणकेश्वर - उदगीर मार्गावरील इंद्रराळ येथील पुलावरून पाणी वाहत आहे. 2. बोटकुळ निलंगा मार्गावर पुलावरून पाणी वाहत आहे. 3. अतनूर येथील पुलावरून पाणी वाहत आहे. उदगीर-अतनूर-बाराळी रस्ता बंद आहे. 4. उटी व अलमला रस्त्यावर पुलावरून पाणी जात असल्यामुळे त्या मार्गावरील वाहतूक बंद आहे. 5. दैठणा येथील पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे अजनी ते उदगीर वाहतूक बंद आहे. 6. औसा ते हसलगन रोडवर जवळगावाडी येथे पुलावरून पाणी जात असल्यामुळे सदर मार्गावर वाहतूक बंद आहे. 7. एकंबा येथील पुलावर पाणी आल्यामुळे सदर मार्गावरील वाहतूक बंद आहे. 8. धडकनाळ बोरगाव च्या पुलावर पाणी आल्यामुळे उदगीर ते देगलूर मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. 9. मौ शेळगाव तालुका चाकुर मध्ये तिरु नदीवरील पुलावरून पाणी वाहत आहे. 10. सिंगनाळ ता. निलंगा येथील ओढ्याचे पाणी पुलावरून वाहत असल्याने सिंगनाळ येथील वाहतूक बंद आहे 11. ढोरसांगवी गावचा संपर्क तुटला नदी वरून पाणी जात आहे 12. उस्तुरी ते टाकळी ता. निलंगा येथील ओद्याचे पाणी पुलावरून वाहत असल्याने उस्तुरी येथील वाहतूक बंद आहे. 13. हालसी (तु.) वरून तुगाव जाणाऱ्या रस्त्यावर नदीचे पाणी आल्यामुळे रस्ता बंद आहे. 14. वायगाव पाटी ते गादेवाडी तालुका अहमदपूर रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहत आहे  15. हासोरी खुर्द ते हासोरी बु ता. निलंगा जाणाऱ्या रस्त्यावर पुलावरून पाणी वाहत आहे रस्ता बंद आहे. 16. मौजे शेणकुड येथील पूल पाण्याखाली गेल्यामुळे बरेच दिवसापासून हा मार्ग बंद झाला आहे पण ढालेगाव आणि सांगवी सु असे दोन पर्यायी मार्ग चालू आहेत. 17. काल रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे नळेगाव सज्जातील हटकरवाडी एक या गावातील नदीला आलेल्या पुरामुळे हटकरवाडी ते नळेगाव हा रस्ता बंद झालेला असून पुलाच्या वरून दोन ते तीन फूट पाणी वाहत आहे. 18. नळेगाव ते लिंबाळवाडी रस्त्यावरील पुलावरून पाणी जात असून सदर रस्ता सुद्धा बंद झालेला आहे.19. शिरूर अनंतपाळ ते हणमंतवाडी जाणारा पुल पाण्याखाली गेला आहे. 20. हालसी हा. ओढ्यावरून पाणी जात आहे त्यामुळे हालसी ते हातरगा रस्ता बंद आहे. 21. अहमदपूर तालुका हासरणी ते उन्नी जांब रस्त्याच्या पुलावरून पाणी जात असल्यामुळे सदरील रस्ता बंद झाला आहे. पर्यायी रस्ता हाडोळती मार्गे आहे 22. मौजे शिरूर अनंतपाळ ते नागेवाडी जाणारा घरणी नदीवरील पुलावरून पाणी वाहत आहे. 23. नळेगाव ते लिंबाळवाडी रस्त्यावरील पुलावरून पाणी जात असून सदर रस्ता सुद्धा बंद झालेला आहे. 24. निलंगा तालुक्यातील मौ. शिवणी को. ते आनंदवाडी शि.को. येथील ओढ्याचे पाणी पुलावरून वाहत असल्याने मौ. शिवणी को. ते आनंदवाडी शि.को. येथील वाहतूक बंद आहे. 25. आनंदवाडी सुनेगाव पुलावरून पाणी गेल्यामुळे सदरील रस्ता बंद झाला आहे. पर्यायी रस्ता उपलब्ध आहे. 26. औराद - वांजरखेडा नदीपात्रातील पुलावरून पाणी वाहत आहे त्यामुळे रस्ता बंद झाला आहे. 27. सोनखेड ता. निलंगा किटीअवेर पुलावरून पाणी. 28. औराद शहाजानी ता. निलंगा ते भालकी जाणाऱ्या रस्त्यावर भातंबरा गावात जवळ नदीचे पाणी रस्त्यावर वाहत असलेल्यामुळे रस्ता बंद झाला आहे.
29. चिलवंतवाडी ते कासार बालकुंद रस्त्यावर पाणी असल्यामुळे गाडी बंद आहे. 30. शिरूर अनंतपाळ जवळ घरणी नदी ला पाणी आल्याने पुलावरून पाणी वाहत असल्याने सदर मार्गावरील कानेगाव व टाकळी बसेस नळेगाव येरोळमोड मोड मार्गे मार्गस्थ करण्याचे सुचना आहेत. 31. वरवंटी ते शिंदगी च्या मधील पुलावरून पाणी जात आहे. 32. लातूर - निजामाबाद मार्गावर नरसी येथे नदीपुलावरून पाणी वाहत असल्यामुळे वाहतूक बंद आहे. 33. उदगीर निझामाबाद मार्ग मुखेड नियत नरसी व बिलोली च्या मध्ये तळणी येथे रस्त्यावर पाणी आल्याने सदरची वाहतूक बंद आहे. त्यामुळे सदरचे नियत नरसी येथून परत बोलावले आहे. 34. शिरूर अनंतपाळ ते येरोळ-उदगीर जाणाऱ्या रस्त्याच्या पुलावरून पाणी वाहत असलेल्यामुळे रस्ता बंद झाला आहे. 35. शिरूर अनंतपाळ ते हणमंतवाडी जाणारा पुल पाण्याखाली गेला आहे रस्ता बंद झाला आहे. 36. शिरशी तालुका लातूर सरहद्द ते धानोरा ते ईजिमा-115 रस्त्यावरील साखळी क्रमांक 0/700 येथील नळकांडी पुलाजवळ भराव वाहून गेल्यामुळे रस्ता वाहतुकीस धोकादायक होऊन रस्ता बंद आहे.
37. औसा तालुका मौजे पोमादेवी जवळगा ते संक्राळ रस्त्याच्या पुलावर पुराचे पाणी आलेले आहे, वाहतुकीसाठी रस्ता बंद केलेला आहे. 38. जळकोट तालुक्यातील ढोरसंगवी आणि धनगरवाडी या गावाचा लाळी बु पुलावरून पाणी जात असल्याने सम्पर्क तुटला आहे. 39. नावंदी ते उदगीर ग्रामरस्तावरील ओढ्याला पूर आल्याने सध्या बंद करण्यात आला आहे. 40. मौजे सावरगाव थोट तालुका अहमदपूर या गावातील सर्व पुलाहून पाणी जात आहे. पर्यायी रस्ता नाही. 41. मौ. शेडोळ ता. निलंगा ओढ्याच्या पाण्यामुळे रस्ता बंद असून योग्य ती दक्षता घेण्याबद्दल गावाकऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.
             *नागरिकांना आवाहन*
नदीकाठच्या गावांना, शेतकऱ्यांना, नदीकाठी वस्ती करुन राहिलेल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. कृपया, नदीपात्रात जाणे टाळा, आपल्या मालमत्तेची आणि जनावरांची काळजी घेण्याचे आवाहन...1. नागरिकांनी दुभती तसेच इतर जनावरे झाडाखाली, पाण्याच्या स्त्रोताजवळ, विद्युत खांबाजवळ बांधू नयेत. त्यांना सुरक्षित ठिकाणी बांधावे. आपल्या जनावरांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करुन स्वतः सुरक्षित ठिकाणचा आसरा घ्यावा. 2. जलसाठ्याजवळ, नदीजवळ जावू नये. आपल्या मुलांना जलसाठ्यावर, नदीवर पोहण्यासाठी पाठवू नये. शाळा, महाविद्यालयातील शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना याबाबत सूचित करावे. 3. पुलावरुन, नाल्यावरुन पाणी वाहत असतांना कोणीही स्वतः किंवा वाहनासह पूल, नाला ओलांडण्याचा प्रयत्न करु नये. पूर प्रवण क्षेत्रात कोणीही जाऊ नये. 4. पाऊस सुरु असतांना विजेच्या तारा, जुन्या इमारती कोसळण्याची शक्यता असते, तरी त्यापासून दूर राहण्याची खबरदारी घ्यावी. 5. जिल्ह्यातील बरेच रस्ते / पुल पाण्याखाली गेले असून या ठिकाणावरून पाण्याचा स्तर कमी होईपर्यंत कोणीही स्वतः किंवा वाहनासह रस्ता / पुल / नाला ओलांडण्याचा प्रयत्न करू नये. 6. नागरिकांनी शक्यतो आप-आपल्या घरीच राहावे. तसेच घराबाहेर असलेल्या नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा, 7. जिल्ह्यातील नागरिकांनी विशेषतः नदीकाठच्या गावांनी सतर्क राहून स्वतःची / आपल्या कुटूंबाची/आपल्या पशूधनाची काळजी घ्यावी.
****

ऊस लागवडीपासून तोडणी आणि गाळपापर्यंत अधिक उत्पादन व कमी खर्चासाठी अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करावा माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख

       
      लातूर प्रतिनिधी : ऊस हे आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाचे पीक असून,शेतकरी,कर्मचारी,कामगार,मजूर सर्वांनी मिळून साखर उद्योगातील आव्हानांना तोंड द्यावे.ऊस लागवडीपासून तोडणी आणि गाळपापर्यंत अधिक उत्पादन व कमी खर्चासाठी प्रत्येकाने अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करावा असे आवाहन राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथालातूरचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केले आहे .
      ट्वेंटीवन शुगर्स लिमिटेड उद्योग समूहाच्या वतीने शुक्रवार, दि. १५ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी  लातूर शहरातील हॉटेल वैष्णव येथे सर्व युनिटच्या कर्मचाऱ्यांसाठी ऊस पीक परिसंवाद आणि हार्वेस्टर मशीन प्रशिक्षण उपक्रम आयोजित करण्यात आला.या कार्यक्रमाला ट्वेंटीवन शुगर्सचे व्हाईस चेअरमन विजय देशमुख,ऊस तज्ञ सुरेश माने पाटील विलास सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील,जनरल मॅनेजर संतोष बिराजदार,तसेच श्री.सुभाष पाटील, श्री. सुभाष सुरवसे आदी मान्यवर उपस्थित होते.
     यावेळी बोलताना माजी मंत्री आमदार अमित देशमुख म्हणाले की "विकासरत्न विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली गेल्या चार दशकांत ऊस क्षेत्रात मोठे काम झाले. विकासरत्न विलासराव देशमुख ‘मांजरा’ साखर कारखान्याने देशात पहिल्यांदाच १०० टक्के हार्वेस्टरने ऊसतोड केली आहे. या उपक्रमाचे श्रेय सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांना जाते. हार्वेस्टरकर्मचाऱ्यांनी उत्तम काम केले तर त्यांना कायम नोकरीत सामावून घेऊ.जगातजे झाले नाही ते आपण लातूरमध्ये करून दाखवू,” असेही त्यांनी नमूद केले.
     यावेळी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे ऊस तज्ञ सुरेश माने पाटील यांनी ऊस जातींची ओळख, लागवड, खोडवा व्यवस्थापन, रोग व कीड नियंत्रण, तसेच पाणी व्यवस्थापन याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.विलास सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील यांनी नोंदणी, ऊस बियाणे व्यवस्थापन, अंतर मशागत, ऊस तोडणी आदी विषयांवर माहिती दिली.तर न्यू हॉलंड हार्वेस्टर कंपनीचे सुवर्णसिंग पाटील व सागर कदम यांनी मशीनविषयक
प्रशिक्षण दिले.
     कार्यक्रमाची सुरुवात माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. हार्वेस्टर ऑपरेटर व चालकांसाठी तयार केलेल्या मार्गदर्शक पुस्तिकेचे विमोचन आमदार अमित देशमुख यांच्या हस्ते झाले. तसेच गेल्या गळीत हंगामात सर्वाधिक तोडणी व वाहतूक करणाऱ्या हार्वेस्टर व्यवस्थापक, ऑपरेटर आणि
चालकांचा सत्कारही करण्यात आला.
     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल इंगळे पाटील यांनी केले तर शेवटी आभार एस.आर.केळकर यांनी मानले.

*लातूर पोलिसांच्या सतर्कतेमुळे बालविवाह रोखला..*

      लातूर (पोअका) : लातूर तालुक्यातील एका गावात होत असलेला बालविवाह लातूर पोलिसांनी सतर्कता दाखवत मुला-मुलीच्या आई वडिलांचे प्रबोधन करुन रोखला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक 14 ऑगस्ट रोजी सकाळी महाराष्ट्र पोलिसांच्या डायल 112 वर फोन करून एका नागरिकांने लातूर तालुक्यातील 12 नंबर परिसरात बालविवाह होणार असल्यासंदर्भात माहिती लातूर पोलिसांना दिली. त्यावरून डायल 112 येथील कार्यरत पोलीस अधिकारी/अमलदारांनी तत्परतेने कारवाई करत वरिष्ठांच्या मार्गदर्शनात सदरची माहिती दामिनी व भरोसा सेल च्या पथकाला दिली. त्यावरून भरोसा सेलचे महिला पोलीस उपनिरीक्षक शामल देशमुख व त्यांच्या पथकाने वेळेत सदर ठिकाणी पोहोचून होणारा बालविवाह थांबविला तसेच बालविवाह लावणाऱ्या पालकांना नोटीसा देऊन बालकल्याण समिती समोर हजर राहणे संदर्भात समज दिली आहे.
      सजग नागरिकांने डायल 112 वर दिलेल्या माहितीवरून पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात लातूर पोलिसांच्या भरोसा सेल व दामिनी पथकातील पोलीस उपनिरीक्षक शामल देशमुख,  डायल 112 युनिटचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक विश्वनाथ ढोले, पोलीस अंमलदार, नितीन कोतवाड, चिंतामणी पाचपुते,चित्रा कुंभार, शंकर बुड्डे, चालक पल्लवी चिलगर  तसेच सोबत चाइल्ड लाइन चे बापू सूर्यवंशी यांनी अतिशय तत्परतेने कारवाई करून वेळीच बालविवाह रोखला आहे.

वैशिष्ट्यीकृत बातम्या

पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या बसलातूर मध्यवर्ती बसस्थानकातून सुटणार

             लातूर, दि. 23 (जिमाका): राज्य परिव मध्यवर्ती बसस्थानक क्र. 1 लातूर येथील काँक्रीटीकरणाचे काम 27 जानेवारी, 2025 पासू...

लोकप्रिय बातम्या